मला इच्छामरणाची परवानगी द्या : किडनी विकलेल्या शेतकरी रोशन कुळे मुख्यमंत्र्यांना आर्त विनंती.

मला इच्छामरणाची परवानगी द्या : किडनी विकलेल्या  शेतकरी रोशन कुळे मुख्यमंत्र्यांना आर्त विनंती.


एस.के.24 तास 


नागभीड : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन शिवदास कुळे यांनी अवैध सावकारीच्या जाळ्यात अडकून कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता त्यांनी थेट मुख्यमंत्री यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे." माझी शेती बळजबरीने घेतली गेली,कुटुंब उपासमारीच्या स्थितीत आहे आणि चार महिन्यांपासून न्यायासाठी प्रशासनाच्या दारात चकरा मारत आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील शेतकरी रोशन शिवदास कुळे यांची हृदयद्रावक कहाणी पुन्हा एकदा समोर आली आहे. अवैध सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या कुळे यांनी मुख्यमंत्री यांना थेट पत्र लिहून आपल्या कुटुंबाच्या अत्यंत बिकट परिस्थितीची माहिती दिली असून, न्याय न मिळाल्यास इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी केली आहे.


२ एप्रिल २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात रोशन कुळे यांनी नमूद केले आहे की, त्यांच्या प्रकरणात शासनाने काही प्रमाणात कारवाई केल्याबद्दल ते आभारी आहेत. आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यामुळे न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असली, तरी प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यातील अडचणी अद्याप कायम आहेत.


कुळे यांनी पत्रात म्हटले आहे की, अवैध सावकारांनी त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकून त्यांची शेती बळजबरीने आपल्या नावावर करून घेतली. त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली ०.४५ हेक्टर शेती सावकाराने स्वतःच्या नावावर करून घेतली, तर ०.९९ हेक्टर शेती दलालामार्फत त्यांच्या पत्नीच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या इच्छेविरुद्ध आणि दबावाखाली झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि कर्जाचा ताण कमी करण्यासाठी त्यांना जबरदस्तीने किडनी विकण्यास भाग पाडण्यात आले, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. सध्या ते फक्त एका किडनीवर जीवन जगत असून, त्यामुळे त्यांची प्रकृतीही खालावलेली आहे.


त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांचे वडील मानसिक आजाराने त्रस्त असून त्यांच्या पायाला अपंगत्व आहे, त्यामुळे ते चालू शकत नाहीत आणि पूर्णपणे मुलावर अवलंबून आहेत. मात्र स्वतःची प्रकृती बिघडल्याने कुळे यांना काम करणेही शक्य होत नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.


कुळे यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने आरोपींवर कारवाई केली असली तरी अद्याप आरोपींची संपत्ती गोठवण्यात आलेली नाही आणि त्यांची शेतीही परत मिळालेली नाही. त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य अंधारात गेले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.


पत्राद्वारे त्यांनी शासनाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये बळजबरीने हस्तांतरित केलेली ०.४५ व ०.९९ हेक्टर शेती तात्काळ रद्द करून परत मिळवून देणे, संबंधित आरोपींची संपत्ती गोठवणे, प्रकरणातील पुढील कारवाई जलदगतीने करणे आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तातडीची आर्थिक मदत देणे या मागण्यांचा समावेश आहे.


रोशन कुळे यांनी पत्राच्या शेवटी अत्यंत वेदनादायी शब्दांत, शासनाने त्यांच्या परिस्थितीची दखल घेऊन त्यांना जगण्यासाठी आधार द्यावा.अन्यथा या असह्य परिस्थितीत जगणे कठीण झाल्याने इच्छामरणाची परवानगी द्यावी,अशी आर्त मागणी त्यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !