छत्तीसगड सीमेवर चकमक ; नक्षल कमांडर भास्कर ठार,तीन दिवसांत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान.
एस.के.24 तास
बिजापूर (छत्तीसगड) : तेलंगणा - महाराष्ट्र सीमेवरील छत्तीसगड मध्ये बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ५ जून पासून चकमक सुरू आहे.तीन दिवसांत सात नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले.
पहिल्याच दिवशी सहा राज्यांतील " मोस्ट वाँटेड " व तीन कोटींचे बक्षीस असलेला केंद्रीय समिती सदस्य नरसिंहचलम उर्फ सुधाकर उर्फ गौतम वय,69 वर्ष याचा खात्मा करण्यात आला होता.दुसऱ्या दिवशी तेलंगणा राज्य समिती सदस्य व नक्षल कमांडर भास्कर उर्फ मैलारापू अडेल्लू वय,45 वर्ष याच्यासह दोन महिला नक्षलवाद्यांना, तर आज 7 जून रोजी आणखी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
भास्करवर ४५ लाख रुपयांचे बक्षीस होते. तो चळवळीत ‘टॉप कमांडर’ म्हणून परिचित होता. नक्षलवादी संघटनेच्या धोरणात्मक कारवायांमध्ये त्याचा सहभाग असे. भास्कर अनेक मोठ्या घटनांचा सूत्रधार असल्याने सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश मानले जात आहे.
छत्तीसगड मधीलबिजापूर च्या घनदाट जंगलात असलेल्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांनी आतापर्यंत सात जणांना टिपले.
६ जून रोजी रात्री उशिरा भास्करची ओळख पटली. अद्याप पाच जणांची ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलांच्या पथकांनी परिसराला सर्व बाजूंनी वेढा घातला असून शोधमोहीम अजूनही सुरू आहे. बिजापूर पोलीस व केंद्रीय सुरक्षा बलाचे जवानांकडून नक्षलविरोधी मोहीम अजून गतिमान करण्यात आली आहे.
अत्याधुनिक शस्त्रे जप्त
चकमकीनंतर जवानांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त केले. यामध्ये एके-४७, इन्सास रायफल्स, देशी बनावटीचे पिस्तूल,ग्रेनेड,वायरलेस सेट आणि नक्षल साहित्यांचा समावेश आहे.
ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची पुष्टी करण्यासाठी फॉरेन्सिक आणि गुप्तचर पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.
जवानांना सर्पदंश, मधमाशांचा चावा
या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाच्या काही कर्मचाऱ्यांना साप चावणे, मधमाशांचा दंश झाला. डिहायड्रेशन व मोहिमेदरम्यानदेखील काही जवान जखमी झाले. त्या सर्वांवर योग्य ते उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.