वैरागड - आरमोरी मार्गावर भीषण अपघात ; ठाणेगावच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू..!
📍रुग्णवाहिकेच्या विलंबाने संतप्त नागरिकांचा संताप; १०८ सेवेवर गंभीर आरोप..!
एस.के.24 तास
आरमोरी : वैरागड - आरमोरी मार्गावरील " हातमोड्या " जवळ आज 24/04/2026 सायंकाळी 7.00 वाजता झालेल्या भीषण अपघातात ठाणेगाव येथील ५० वर्षीय कर्मवीर भुरशे यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. आरमोरीहून येणाऱ्या बसला दुचाकी धारकाने धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कर्मवीर भुरशे वय,५० वर्ष रा. ठाणेगाव हे वैरागडवरून आपल्या गावी ठाणेगावकडे दुचाकीने जात होते. दरम्यान, हातमोड्या ठिकाणाजवळ समोरून येणाऱ्या बसला दुचाकी धारकाणे जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की,भुरशे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
जखमीला तातडीने उपचार मिळावेत यासाठी उपस्थित नागरिकांनी तात्काळ '१०८' या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेला वारंवार फोन केला. मात्र, या सेवेकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही किंवा रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही, त्यामुळे आरमोरी तालुक्यातील आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. असा आरोप प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे.
" जर रुग्णवाहिका वेळेवर आली असती, तर कदाचित या व्यक्तीचे प्राण वाचले असते. प्रशासकीय अनास्थेमुळे एका निष्पाप व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे," अशा तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.या घटनेमुळे ठाणेगाव परिसरात आणि मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परीसरात शोककळा पसरली आहे. व आपत्कालीन सेवा सुधारण्याची मागणी आता जोर धरत आहे.

