विदर्भातील भंडारा,गोंदिया,नागपूर सह गडचिरोली मध्ये काही संस्थाचालकांची भूमिकाही संशयास्पद ; संस्थाचालक पोलिसांच्या " रडार " वर ?
एस.के.24 तास
गडचिरोली : राज्यात गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या अटकसत्रानंतर आता शिक्षण संस्थाचालक पोलिसांच्या " रडार " वर आले आहेत. यात गडचिरोलीतील काही संस्थाचालकांना देखील अटक होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी आतापर्यंत भंडारा जिल्ह्यातील संस्थाचालक चरण चेटुले आणि दिलीप धोटे यांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असून यात पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया,नागपूरसह गडचिरोलीतील काही संस्थाचालकांची भूमिकाही संशयास्पद आहे.
त्यामुळे पोलिसांनी कारवाईची चक्रे संस्थाचालकांकडे वळवली आहे.शनिवारी विशेष तपास पथकाने शालार्थ आयडी घोटाळ्यात विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेचे संस्थाचालक दिलीप धोटे यांना अटक केली.
धोटे यांनी १५ शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून त्यांना नोकरी दिल्याचा आरोप आहे. तसेच प्रत्येकाकडून त्यांनी १५ लाख रुपये घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याआधी पोलिसांनी चरण चेटुले (६३, भंडारा) यांना अटक केली होती.आता दिलीप धोटे यांची यांना अटक करण्यात आली आहे.
धोटे यांनी १५ शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्यांनी राजाबक्षा येथील नवयुवक प्राथमिक शाळेत या शिक्षकांना नियुक्ती दिली. या शिक्षकांचे नियुक्ती विठ्ठल रुक्मिणी संस्थेत झाली असली तरी त्यांना वेगळयाच शाळेत नोकरी देण्यात आली. एसआयटी प्रमुख सुनीता मेश्राम यांनी सर्व शिक्षकांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवला.
शिक्षकांनी १५ लाख रुपये धोटे यांना दिल्याची कबुली दिली. सोबतच त्यांना मिळत असलेल्या वेतनातून काही पैसे धोटे ठेवत असल्याचा आरोप केला आहे. असाच प्रकार गडचिरोली देखील घडल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. त्यामुळे काही मोठ्या संस्थाचालकांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अल्पसंख्यांक संस्थांवर संशय : -
शिक्षक भरतीवरील बंदीवर काही संस्थाचालकांनी अल्पसंख्यांकचा उपाय शोधला आहे. या आधारे त्यांनी मोठ्या प्रमाणात भरती केली. यात कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाल्याचीही माहिती आहे.
काही शाळांना अल्पसंख्यांक दर्जा प्रदान करताना नियमांना बगल देण्यात आले.यात मोठ्या अधिकाऱ्यांनीही आपले हात ओले केल्याची चर्चा आहे.
शालार्थ आयडी घोटाळा उघड झाल्यानंतर या सर्व संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. काही दिवसांपूर्वी यतीलच दोन संस्थेने भरतीचे दस्ताऐवज नव्याने बनविण्याच्या सूचना संस्था प्रशासनातील शिक्षक व बाबूंना दिल्या होत्या. त्यामुळे याही संस्थांची चौकशी होण्याची शक्यता आहे.