सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर येथे शौचास गेलेल्या व्यक्तीला हत्ती हत्तीनी सोंडेने आपटून जागीच ठार केले.
एस.के.24 तास
सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या दोन हत्तींनी काही दिवसांपूर्वीच परत गेले होते.पुन्हा या दोन हत्तींनी चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केल्याने नागरिक दहशतीत असतांनाच सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर मोठा येथील एका व्यक्तींना दोन हत्ती पैकी एकाने आपल्या पायाने चिरडले तर दुसर्या हत्तीनी सोंडेने आपटून जागीच ठार केल्याची घटना रविवार दि.15 जून ला घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
ही थरारक रविवारी सकाळी 6:30.वा.च्या सुमारास घडली असून रानटी हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव मारोती मसराम वय,60 वर्ष असे आहे.मारोती ला पाच मुले आहेत.फादर्स डे च्या दिवशी ही घटना घडली.या दिवशी पाचही मुले वडिलाला पोरके झाल्याने कुटूंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
मारोती यांना पॅरालीसीस असल्याने गावालगत असलेल्या पडित जागेत सकाळी शौचास गेले होते.अशातच दोन हत्ती तेथे आले.मारोती अचानक उभा झाला. परंतु त्याला पळता आले नाही.अशातच हत्तीने मारुतीला सोंडेत पकडून हवेत फिरवून जमिनीवर आपटले तर दुसर्या हत्तीने पायाने चिरडले त्यात मारोतीचा जागीच मृत्यू झाला.
मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील दोन हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील सावली व त्यानंतर सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलातही फिरत होते.आता सिन्देवाही नजीक असलेल्या जाटलापूर जंगल परिसरातील गाव शिवारात ते दिसत आहेत. या हत्तींमुळे शेतकर्यांचेही नुकसान झाले आहे.
वनविभाग या हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगत असले तरी रविवारी सकाळी या हत्तीने जिल्ह्यात पहिला बळी घेतला आहे.घटनेची गावकर्यांना माहीत होताच घटनास्थळी पोहोचले.पोलिस पाटलांनी तत्काळ सिंदेवाही पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक राठोड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाचे अधिकारीही दाखल झाले.
मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथे पाठवण्यात आला.वन विभागाचे अधिकारी त्यांच्या मागावर आहेत.वृत्तलिहीपर्यंत हत्तींच्या शोध लागलेला नव्हता. सदर दोन हत्ती गडचिरोली जिल्ह्यातून उमा नदी पार करत ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आले आहेत.
तेव्हा पासून सिंदेवाही व सावली तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांची सतत हालचाल सुरू आहे. काही गावांत ते शिरले असून नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे जाटलापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे