घरकुलाच्या वाळूचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू ; घरकुल च्या मोफत वाळूची इतरत्र बेकादेशीर विक्री.
📍कारवाईस टाळाटाळ तहसीलदारच जबाबदार ?
एस.के.24 तास
भंडारा : घरकुल बांधणाऱ्यांना वाळूच्या खर्चातून दिलासा मिळाला आणि वाळू माफियांवर अंकुश ठेवण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याची योजना राज्य शासनाने कार्यान्वित केली.भंडारा जिल्ह्यात या योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र असून घरकुलाच्या वाळूचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
लाभार्थ्यांच्या नावावर उचललेल्या मोफत वाळूची ट्रकचालक बेकादेशीररित्या इतरत्र विक्री करीत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, घरकुल यादीत नाव नसलेल्यांचीही रॉयल्टी तहसील कार्यालयातून तयार केली जात असल्याने तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी आणि वाळू माफियांच्या संगनमताने हा काळाबाजार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
राज्य सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांना आता ५ ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे. जिल्ह्यातील अनेक गरजू ऑनलाईन नोंदणी करून घरकुलाच्या यादीत नाव येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र आता घरकुल लाभार्थ्यांच्या याद्यांमध्येच घोळ असल्याचे दिसून येत आहे. एका तालुक्यातील व्यक्तीचे नाव दुसऱ्या तालुक्याच्या यादीत येत आहे.
असाच धक्कादायक प्रकार लोकसत्ताने काही दिवसांपूर्वी उघड केला होता. मोहाडी तालुक्यातील वरठी येथील अश्विन मधुकर शेंडे यांनी दोन महिन्यापूर्वी घरकुलसाठी नोंदणी केली होती. २३ मे रोजी त्यांना तहसील कार्यालयातून घरकुल मंजूर झाल्याचा फोन आला आणि मोफत वाळूसाठी ओटीपी विचारण्यात आला.
अश्विन शेंडे हे मोहाडी तालुक्यातील रहिवासी असताना त्यांचे नाव भंडारा तालुक्यातील सोनोली गावच्या घरकुल यादीत कसे आले ? हा घोळ समजण्याआधीच शेंडे यांच्या मोबाईलवर २६ मे रोजी महसूल विभागाकडून वाळूची उचल केल्याची पावतीही आली. मात्र वाळू त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. विशेष म्हणजे, सोनोली या नियोजित स्थळी वाळू न टाकता ट्रकचालकाने भंडारा येथील खात रोड येथे वाळू टाकली.
ट्रक क्रमांक एम.एच २७ बीएक्स ४१३४ चा ट्रक मालक सुमित नारनवरे आणि चालक कृष्णा यांनी २६ मे रोजी शेंडे यांच्या घरकुलच्या नावावर पवनी तालुक्यातील ईटगाव डेपो येथून रेतीची उचल करून खात रोड भंडारा येथे वाळू टाकली. सोनोली येथील लोकेशन असताना खात रोड येथे वाळू टाकण्याचे कारण काय, कुणाच्या परवानगीने नारनवरे याने खात रोड येथे ही मोफत वाळू विक्री केली.
तहसीलदार,भंडारा यांनी ट्रक चालकावर कारवाई का केली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे आहेत. अश्विन शेंडे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि वरठी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली असून १२ दिवस लोटूनही दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
याबाबत तहसीलदार माकोडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, एका लिपिकाला प्राधिकृत करून या प्रकरणात संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १० दिवस लोटून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
दरम्यान, तहसील कार्यालयात ऑपरेटर पदावर कार्यरत स्मिता शेंडे यांनी या प्रकरणात धमकाविण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार अश्विन शेंडे यांनी वरठी पोलीस ठाण्यात केली. याबाबत स्मिता शेंडे म्हणतात की, मे महिन्यात अश्विन शेंडे यांनी घरकुल रेती बाबत तक्रार केली होती.
शेंडे यांचे नाव घरकुल यादीमध्ये नसतांना सुद्धा कागदपत्रांची योग्यरित्या पडताळणी न करता व कोणतीही खात्री न करता मी त्यांच्या आधारकार्डच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रिया केली व शेंडे यांच्या नावे शासकीय रेती मंजूर झाली. माझ्या चुकीमुळे हे घडले.
कारवाईस टाळाटाळ : -
घरकुल यादीत घोळ झाल्याची आणि मोफत वाळूची अवैध विक्री झाल्याची तक्रार देण्यास अश्विन शेंडे तहसीलदार माकोडे यांच्याकडे गेले असता त्यांनी उडवाउडवीची आणि उलट उत्तरे दिली , शिवाय या प्रकरणात ते संबंधित कर्मचारी, अधिकारी आणि ट्रक मालक चालक यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
असा आरोप अश्विन शेंडे यांनी केला आहे. शिवाय १ मार्च ते ५ जूनपर्यंत सुमित नारनवरे याने कुठे कुठे घरकुलाची मोफत वाळू टाकली याची चौकशी करून या प्रकरणात गोवलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेंडे यांनी केली आहे.
तहसीलदारच जबाबदार ?
घरकुलाला मोफत वाळू पुरवण्याची जबाबदारी शासनाने तहसीलदार यांच्यावर सोपवली आहे. दरम्यान, भंडारा येथे शासनाची फसवणूक करून घरकुलाच्या मोफत वाळूची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. तहसीलदार यांच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार सुरू असून ते कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांना यासाठी जबाबदार का धरू नये, असा प्रश्न माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे यांनी उपस्थित केला आहे.