आश्रम शाळेची भिंत कोसळून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू,तिघी गंभीर जखमी.
📍 मुख्याध्यापक एन.एम.कथे आणि महिला अधीक्षक एस.पी.रावत निलंबित.
एस.के.24 तास
अमरावती : मेळघाटमधील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत भीषण दुर्घटना घडली असून,भिंत कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेत इतर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली होती.त्यांच्या मागणीनंतर अखेर प्रशासनाने कारवाई केली आहे.
ही घटना घडल्यानंतर आदिवासी विभागाने तात्काळ दखल घेतली असून,शाळेचे मुख्याध्यापक एन.एम.कथे आणि महिला अधीक्षक एस.पी.रावत यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासणी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथे वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा आहे.या शाळेतील वसतिगृहात पाण्याच्या टाकीची भींत अचानक कोसळली. त्यावेळी काही विद्यार्थिनी तिथे उपस्थित होत्या.भिंत कोसळल्यामुळे चौदा वर्षीय विद्यार्थिनी ढिगाऱ्याखाली दबून गंभीर जखमी झाली आणि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
यात शाळेचे मुख्याध्यापक व महिला अधीक्षक एस.पी.रावत निलंबित करण्यात आले आहेत.या प्रकरणी नातेवाईकांनी आक्रमक होत जबाबदार व्यक्तींवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत चिखलदरा तालुक्याचे तहसीलदार,तालुका आरोग्य अधिकारी आणि आदिवासी निरीक्षक यांचा समावेश आहे. समिती लवकरच घटनास्थळी भेट देऊन अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
या दुर्घटनेमुळे आदिवासी भागातील शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.शाळेच्या इमारतीची दुरवस्था,देखभाल दुरुस्तीचा अभाव,आणि जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे निष्पाप विद्यार्थिनीचा जीव गेला,ही अतिशय गंभीर बाब आहे.
या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे मेळघाटातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. या घटनेत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आदिवासी विकास विभागाने दिले आहे.