हॅलो साहेब...मी माझ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळलो ; पोलिस त्याच्या जवळ जाताच त्याने गोदावरी नदी पात्रता उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली.
एस.के.24 तास
नांदेड : हॅलो साहेब.. मी माझ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळलो आहे. पत्नी खूप छळ करत आहे.घरी वाद देखील घालत आहे. मला जगायचं नाही, तिच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, असे म्हणत एका २५ वर्षीय तरुणाने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली.
यावेळी पोलिसांनी त्याचे लोकेशन घेण्यासाठी त्याला अर्धा तास बोलते केले.मदतीसाठी त्याच्या जवळ जाताच त्याने गोदावरी नदी पात्रता उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेमुळे पोलिसांसह सारेच हादरले आहे.
घटनेच्या दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह पाच ते सात किलो मीटर दूर बोंढार परिसरातील गोदावरी नदी पात्रात आढळून आला. धक्कादायक म्हणजे, त्याच्या लग्नाला केवळ पाच महिने उलटले होते. साईनाथ प्रकाश नून्नेवार (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी देखील लिहिली होती.
मृत साईनाथ नून्नेवार हा नांदेड शहरातील शारदानगर येथील रहिवासी आहे. आई वडील मोलमजुरी करतात. साईनाथ हा कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी हार्डवेअरच्या दुकानात काम करत होता. २५ एप्रिल २०२५ रोजी त्याचा विवाह मुखेड तालुक्यातील जाहूर येथील राजेश्री हिच्या सोबत झाला होता. विशेष म्हणजे राजश्री हिचे यापूर्वी दोन विवाह झाले होते.
आणि हा तिसरा विवाह होता. हातावरील मेहंदी सुखण्यापूर्वीच दोघांमध्ये खटके उडत होते. याच दरम्यान पन्नास हजार रुपये दे नाही तर पोलीस ठाण्यात मानसिक छळाचा गुन्हा दाखल करते आणि सर्वांना जेलमध्ये टाकते, अशी धमकी पत्नी आणि सासरच्या मंडळीनी साईनाथला दिली होती.
आत्महत्येच्या दोनच दिवसांपूर्वी साईनाथने गोळ्या खाऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न देखील केला होता. दरम्यान १० सप्टेंबरला दुपारी तो दुकानातून निघून गेला आणि जुना मोंढा येथील नवीन पूल उड्डाणपुलावर पोहोचला. यावेळी त्याने ११२ क्रमांकावर फोन करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली.
पोलिसांकडून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातं होता. पण पत्नी आणि सासरच्या त्रासाला मी कंटाळलो आहे, मला आत्महत्या करायची आहे अस तो म्हणत होता. लोकेशन शोधण्यासाठी पोलिसांनी त्याला बोलत केलं. शेवटी तो जुना मोंढा येथील नवीन पुलाजवळ असल्याची माहिती मिळाली.
धक्कादायक म्हणजे पोलीस जवळ येताच त्याने कठड्यावर चढून गोदावरी नदीत उडी मारली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली होती. चिठ्ठी आणि मोबाईल कॅरिबॅग मध्ये ठेवून खिशात ठेवले होते. पोलिसांकडून शोध घेण्यात आला.पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याचा शोध काही लागला नाही. दोन दिवसानंतर म्हणजे शुक्रवारी दुपारी बोंढार परिसरातील नदी पात्रात साईनाचा मृतदेह आढळून आला.
पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून साईनाथने आत्महत्या केल्याची तक्रार साईनाथची आई संगीता नुन्नेवार यांनी इतवारा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी मयताची पत्नी राजेश्री नुन्नेवार, सासू अनिता अशोक पांचाळ, शंकर अशोक पांचाळ आणि योगेश अशोक पांचाळ या चार जणा विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.मुलाने उचललेल्या या टोकाच्या पाऊलामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

