आदर्श स्मार्ट ग्राम कळमनामध्ये पक्षी संवर्धनाचा अभिनव उपक्रम.
📍मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पक्षी - पिलांसाठी घरटी उभारणी.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : आदर्श स्मार्ट ग्राम पंचायत कळमना येथे पर्यावरणपूरक व समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम राखत पक्षी व त्यांच्या पिलांसाठी घरटी उभारण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. आदर्श स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून हा सौजन्यशील उपक्रम साकारण्यात आला.
उल्लेखनीय बाब म्हणजे, मागील वर्षी कळमना ग्रामपंचायतीने आर. आर. पाटील सुंदर गाव योजना अंतर्गत चंद्रपूर जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला होता. यावर्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभाग घेत कळमना ग्रामपंचायत अधिक सक्षम, स्वच्छ, सुंदर, डिजिटल व आधुनिक ग्राम म्हणून पुढे जात आहे. गावात आजवर विविध विकासकामे यशस्वीपणे पूर्ण झाली असून, त्याच अनुषंगाने पर्यावरण संवर्धनावर भर देण्यात येत आहे.
पक्षी व त्यांच्या पिलांसाठी सुरक्षित निवारा मिळावा, या उद्देशाने गावातील विविध ठिकाणी आकर्षक व उपयुक्त घरटी उभारण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, माणसाला जशी घराची गरज असते, तशीच गरज पक्षांना व त्यांच्या पिलांनाही असते. त्यातूनच या उपक्रमातला चालणा देण्याचे ठरवले. जनतेची सेवा करत असताना पशु-पक्ष्यांचीही सेवा करण्याची संधी मिळाली हे आनंददायी आहे.
यावेळी बाळकृष्ण पिंगे (पोलीस पाटील), प्रभाकर साळवे (अध्यक्ष, हनुमान मंदिर कमेटी), कवडु पा. गौरकार (स्वागताध्यक्ष, स्वच्छता समिती), लोहे सर (मुख्याध्यापक), दिलीप निमकर सर, शालीक पेदोर सर, विलास गिरसावळे सर, मारोती साळवे, विठ्ठल वाढई (ज्येष्ठ नागरिक), मारोती आस्वले, डॉ. नवनाथ ताजने, दत्तु कुकुडे, देविदास उमाटे, अतुल क्षिरसागर, दौलत विददे, देवराव उमाटे, प्रदीप आत्राम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


