चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील ग्रा.पं.कोंडेखल येथे कामे न करता शासनाचे 26 लाख लंपास गैरप्रकार उघडकीस.
📍सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्याची ग्रामस्थांनची मागणी.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील पंचायत समिती,सावली अंतर्गत येत असलेली कोंडेखल येथे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त म्हणून ग्रामपंचायत परिचित आहे.गेल्या अनेक वर्षांपासून निवडून येतात पण विकास कामे तिथे काहीच दिसत नाही.ग्रामपंचायतीत काम न करताच शासकीय निधीचे लाखो रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार पंचायत समिती प्रशासनाने केलेल्या चौकशीत उघडकीस आला असून येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचेवर अपहार केलेली रक्कम वसूल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस पंचायत समितीकडून यांचेकडे केली आहे.
ग्रामपंचायतीतील तत्कालीन व विद्यमान दोन्ही ग्रामपंचायत अधिकारी यांनी भ्रष्टाचार केल्याने वरिष्ठ अधिकारी यांचा कर्मचाऱ्यांवर किती अंकुश असेल याची प्रचिती सदर प्रकरणावरून येत आहे.पंचायत समिती चे अधिकारी हे जाणीवपूर्वक लक्ष न देता पाठराखण करीत असल्याचे दिसून येत आहे.वरिष्टांनी फक्त कागदोपत्री कार्यवाही न करता फौंजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केल्या जात आहे.कारवाई करून गुन्हा दाखल करून अटक करावे.न केल्यास पंचायत समिती समोर आंदोलन करण्याचा ग्रामस्थांनी दिले आहे.
कोंडेखल येथील ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बोदलकर,सदस्य रोशन वालदे यांनी ग्रामपंचायत कोंडेखल येथे आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती.त्यानुषगाने विस्तार अधिकारी देवतळे यांनी चौकशी केली असता न केलेल्या कामाचा खर्च दाखवून अपरातफर केली आहे.सरपंच सरला कोटगले व ग्रामसेवकांकडून समप्रमाणात रक्कम वसुल करणे,विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी धीरधम्म रायपुरे व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी आनंद देवगडे यांनी कसूर केल्याने त्यांचेवर जिल्हा परिषद कर्मचारी शिस्त व अपील २९६४ कलम ४ नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य करीत आहेत.
1) साहित्य खरेदी केले नसतांना रक्कमेची उचल.
2) १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अंगणवाडी,ग्रामपंचायत, शाळा येथे कोणतेही साहित्य खरेदी न करता ३ लक्ष ३ हजार रुपये गणराज ट्रेडर्सला दिल्याचे दाखवण्यात आले आहे.
3) एकाच वृतपत्रात निविदा जाहिरात.
4) वृतपत्रात जाहिरात देतांना रोस्टर पद्धतीने वृत्तपत्राना जाहिरात देण्याचा नियम आहे मात्र ग्रामपंचायतीने वारंवार चिमूर येथील एकाच वृतपत्रात निविदेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
5) नियमबाह्यरित्या कामे मर्जीतील कंत्राटदारास देणे.
6) चिमूर येथील गजेंद्र राऊत या कंत्राटदारास नियबाह्यपणे निविदा मंजूर करून कामे दिली आहेत.
7) पेंटिंगचा खर्च मात्र पेंटिंग गायब.
8) गावातील पाण्याच्या टाकीला पेंटिंग खर्च ३५ हजार रुपये केले आहे. मात्र टाकीला कुठेच पेटिंग झाल्याचे दिसत नसल्याने पेंटिंगच गायब झाल्याची चर्चा आहे.
9) शासकीय टॅक्सची चोरी.
10) कोणत्याही शासकीय कामात रॉयल्टी,जिएसटी या रक्कम शासन जमा कराव्या लागतात मात्र येथील ग्रामपंचायत अधिकारी यांनी या करांचा भरणा केलेला नसून ६१ हजार ८०० रुपये चोरी केल्याचा प्रकार घडलेला आहे.
11) जुन्याच रस्त्यास नवीन दाखवून निधी लंपास.
12) सिमेंट रस्त्याचे कोणतेही काम न करता जुन्यास रस्त्यास कागदोपत्री नवीन रस्ता दाखवून रक्कम लंपास करण्याचा प्रकार केला आहे.
13) ४ महिन्यापासून ग्रामपंचायत सभाच नाही.
14) प्रत्येक महिन्याला मासिक सभा घेणे अनिवार्य आहे मात्र विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी धीरधम्मं रायपुरे यांनी सलग ४ सभाची नोटीसच काढली नाही. त्यामुळे सदस्यांना पंचायत समितीकडे तक्रार करावी लागली.
15) जुन्या अधिकाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा नविनचा विक्रम.
16) तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी आनंद देवगडे यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्यानंतरही काहीच कारवाई न झाल्याने विद्यमान अधिकाऱ्यांनीही हात धुण्याचा प्रयत्न केला. न केलेल्या कामाचा ६ लक्ष ३४ हजारचा निधी बाहेरील ऑनलाईन सेंटरवरून वळता केला.
तत्कालीन ग्रामअधिकारी यांनी जवळपास १८ लक्ष शासकीय रक्कमेची अफरातफर केली याबाबत सातत्याने तक्रारी करूनही काहीच कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यमान ग्राम अधिकारी रायपुरे यांनीसुद्धा लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ संपत असल्याचा गैरफायदा घेऊन न केलेल्या कामाचे ८ लक्ष रुपये १५ वित्त आयोगातील फंडातून काढले आहे.- रोशन वालदे,ग्रामपंचायत सदस्य कोंडेखल
कोंडेखल ग्रामपंचायतीत कामे न करता शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. गावाच्या विकासासाठी आलेला निधी भ्रष्टाचारात लंपास होणे ही गावासाठी लाजिरवाणी बाब आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या सरपंच व संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर केवळ विभागीय कारवाई न करता फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी व अपहार केलेली संपूर्ण रक्कम वसूल करून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. - सुरेश कन्नमवार,सामाजिक कार्यकर्ता

