डिजिटल युगातही टिकली परंपरा ; आदिवासी गावातील होळी उत्सवाचे प्रेरणादायी चित्र.
एस.के.24 तास
सिरोंचा : गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल आणि सांस्कृतिक वैविध्याने समृद्ध अशा सिरोंचा तालुका येथील टेकडा ताल्ला गावात होळी सणाच्या निमित्ताने जपली जाणारी परंपरा सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक ठरत आहे. आधुनिकतेच्या प्रभावात अनेक पारंपरिक रूढी लोप पावत असताना, या आदिवासी भागात मात्र परंपरेचा जाज्वल्य दीप आजही तेवतो आहे.
होळीच्या पूर्वसंध्येला गावातील लहान मुले व तरुण मंडळी रात्रभर घराघरांत जाऊन पारंपरिक गाणी गातात व वर्गणी गोळा करतात. ग्रामस्थ आनंदाने त्यांचे स्वागत करून आशीर्वाद देतात. सकाळी सर्वजण एकत्र येऊन होळी प्रज्वलित करतात आणि सामूहिक उत्सव साजरा करतात. या प्रक्रियेतून केवळ सण साजरा होत नाही, तर सामाजिक सलोखा, परस्पर विश्वास आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ होते.
आदिवासी भागात सण-उत्सवांना केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व आहे. येथे सण म्हणजे गाव एकत्र येण्याची, मतभेद विसरण्याची आणि नव्या सुरुवातीची संधी असते. होळी हा सण वाईट प्रवृत्तींच्या दहनाचा व चांगुलपणाच्या विजयाचा संदेश देतो. भक्त प्रल्हादाच्या कथेतून श्रद्धा आणि सत्याचा आदर्श पुढे येतो.
गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मते, “ही परंपरा मुलांना संस्कार देणारी शाळा आहे. मोठ्यांचा आदर, समाजाशी नाते आणि एकत्रित जबाबदारीची जाणीव याच माध्यमातून रुजते.” डिजिटल युगातही ग्रामीण व आदिवासी भागात अशा उपक्रमांतून संस्कृतीची मुळे अधिक घट्ट होत असल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे.
परंपरा टिकवणे म्हणजे केवळ भूतकाळ जपणे नव्हे, तर भविष्यासाठी सांस्कृतिक पाया मजबूत करणे होय. टेकडा ताल्ला गावाने होळीच्या निमित्ताने दिलेला हा एकोपा आणि संस्कृती जपण्याचा संदेश खरोखरच अनुकरणीय ठरत आहे.

