बल्लारपूर तालुक्यातील कोठारीतील प्रकार पिकावर जेसीबी फिरवल्याने उचलले टोकाचे पाऊल.
📍तहसीलदार,ठाणेदार समोरच शेतकर्याने घेतले विष.
एस.के.24 तास
गोंडपिपरी : जमिनीचा ताबा घेण्यावरून सुरू असलेल्या वादातून एका शेतकर्याने नायब तहसीलदार अरुण मारोती पारेलवार आणि पोलिसांच्या ताफ्यासमोरच विष प्राशन केल्याची घटना शुक्रवारी घडली.अरुण मारोती पारेलवार (56) असे शेतकर्याचे नाव असून, त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हरणपायली (रिठी) येथील सर्व्हे क्रमांक 1 मधील 4.27 हेक्टर वडिलोपार्जित जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना, कथित खरेदीदार तेजिंदर सिंग दारी हे पोलिस,महसूल कर्मचारी आणि जेसीबीसह शेतात पोहोचले. यावेळी पारेलवार आपल्या कुटुंबीय शेतात कापूस वेचणी व निंदणाचे काम करीत होते. जमिनीच्या कब्जावरून दोन्ही गटांत वाद सुरू असतानाच, शेतात उभ्या असलेल्या कापूस पिकावर जेसीबी फिरवून पीक नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.
उदरनिर्वाहाचे एकमेव साधन डोळ्यादेखत हिरावले जात असल्याचे पाहून उद्विग्न झालेल्या अरुण पारेलवार यांनी शेतात फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन केले. पोलिसांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात हलविले. सध्या या ताबा कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे.प्रशासनाचा गैरवापर करून उभ्या पिकाचे नुकसान करणे हा भारतीय न्याय संहिता कलम 329, 324, व 351 नुसार गुन्हा आहे. गरज पडल्यास या प्रकरणात संबंधित नवीन खरेदीदार व अधिकार्यांविरुद्ध न्यायालयामार्फत नोटीस बजावू.
उच्च न्यायालयाने अशा प्रकरणात दिलेल्या आदेशाच्या आधार घेत आम्ही उभ्या पिकांच्या नुकसानीबाबत नुकसानभरपाई व कठोर कायदेशीर कारवाईची मागणी न्यायालयामार्फत करणार आहोत, असे पीडित शेतकर्याचे अधिवक्ता अॅड. दीपा मोरे यांनी सांगितले आहे.
शेतकरी पुरावे व कागदपत्र देऊ शकले नाही : - अजय मल्लेलवार,नायब तहसीलदार बल्लारपूर
खरेदीदाराच्या अर्जावरून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यांच्याकडे जमिनीबाबत असलेले पुरावे व कागदपत्रांची मागणी केली असता, ते कोणतेही कागदपत्रे देऊ शकले नाहीत.त्यानंतर त्यांनी कीटकनाशक प्राशन केले. त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत, असे बल्लारपूरचे नायब तहसीलदार अजय मल्लेलवार यांनी दिली.

