रेतीची उपलब्धता करून द्या ; अन्यथा आमरण उपोषण ; सावली तालुका काँग्रेस कमेटी शिष्टमंडळाची मागणी. 📍दिनांक २१/०५/२०२५ पासून आमरण उपोषणाचा इशारा.

2 minute read

रेतीची उपलब्धता करून द्या ; अन्यथा आमरण उपोषण ; सावली तालुका काँग्रेस कमेटी शिष्टमंडळाची मागणी.


📍दिनांक २१/०५/२०२५ पासून आमरण उपोषणाचा इशारा.


एस.के.24 तास 


सावली : तालुक्यात रेतीचा दुष्काळ पडलेला आहे,त्यामुळे सामान्य नागरिकांना रेती मिळेनाशी झाली आहे.परिणामता भरपूर घरकुल धारकांचे घरकुले अर्धवट स्थितीत आहेत.ग्रामपंचायतीची कामे रखडलेली आहेत.


१५ वित्त आयोगाचे कामे ठप्प पडलेली आहेत.रेती अभावी सामान्य जनतेची पूर्ण कामे ठप्प पडलेली आहेत.शासनाने घरकुल धारकांना रेतीची उपलब्धता करून देण्याबाबत परिपत्रक काढले तरी मात्र अधिकारी वर्गाचा दुर्लक्षपणाच्या धोरणामुळे  नागरिकांना रेतीची उपलब्धता झालेली नाही.



या संबंधात माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर,तहसीलदार सावली यांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा मागणीची दखल घेण्यात आलेली नाही,त्यामुळे सावली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस दिनेश पाटील चिटणुरवार यांच्या नेतृत्वात दिनांक २१ मे २०२५ पासून तहसील कार्यालय,सावली समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार सावली यांना निवेदनातून देण्यात आला आहे.


या संबंधात सविस्तर वृत्त असे की,शासनाने ३० एप्रिल २०२५ ला एक परिपत्रक काढून घरकुल लाभार्थीना रेतीची उपलब्धता करून देण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत,तहसीलदारांनी ऑनलाईन पासेस घरकुल धारकांना द्यावा,जर कदाचित ऑनलाईन पासेसची प्रक्रिया रखडली तर ऑफलाईन पासेस देण्यात याव्यात असे स्पष्ट केलेले आहे.


मात्र पासेसची प्रक्रिया ( रॉयल्टीची प्रक्रिया ) पूर्ण करण्यास वेगवेगळ्या कारणामुळे रखडलेली आहे.यासंबंधात त्वरित निर्णय घेण्याबाबत प्रशासनास निवेदन दिलेले होते.मात्र प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे.पावसाळा अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे.अश्या परिस्तिथीत रेती घाटातून निघणे कठीण होणार आहे.त्यामुळे रॉयल्टीची प्रक्रिया जलदगतीने करावी.अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वारंवार प्रशासनाकडे लावून धरली , मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.


नुकतेच जिल्हाखनिकर्म अधिकाऱ्यांनी एक पत्र काढून जवळपास १२ रकान्यांची माहिती विचारली आहे,यात लाभार्थिचे आधार कार्ड व मोबाईल नंबर अश्या प्रकारची माहिती ग्रामपंचायत कडून विचारण्यात आलेली आहे.ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळें तालुक्यातील ९४३२ लाभार्थीना रेती मिळणे कठीण झाले आहे.अनेक ग्रामपंचायतींनी बारा रकाण्यातील माहिती प्रशासनाला सादर नं केल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया रखडलेली आहे.


या सर्व बाबींचा सारासार विचार करून दिनेश पाटील चिटणुरवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज तहसीलदार सावली,पोलीस स्टेशन सावली व गटविकास अधिकारी सावली यांना निवेदन देऊन २१/०५/२०५ पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.सदर उपोषणा दरम्यान प्रशासनासमोर २ मागण्या ठेवण्यात आल्या असून त्यात घरकुल धारकांना रेतीची उपलब्धता व ग्रामपंचायतीना रेतीची उपलब्धता करून देणेबाबतच्या मागण्यांचा समावेश आहे.


उपोषणाला बसणाऱ्या व्यक्तिमध्ये माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर दिनेश पा.चिटणुरवार,तालुकाध्यक्ष  नितीन गोहने,माजी सभापती प.स.सावली विजय कोरेवार,माजी सरपंच मोखाळा अनिल म्ह्शाखेत्री,उपसरपंच चकपिरंजी अरविंद भैसारे यांचा समावेश असणार आहे.


तहसीलदार यांचे दालनात चर्चा करताना माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर दिनेश पा.चिटणुरवार,तालुकाध्यक्ष  नितीन गोहने,माजी सभापती प.स.सावली विजय कोरेवार,बोथलीचे सरपंच सुशील रेड्डीवार,माजी सरपंच मोखाळा अनिल म्ह्शाखेत्री,उपसरपंच चकपिरंजी अरविंद भैसारे,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम आदी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !