शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय,चंद्रपूर येथे बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत मृत्यु झाल्याने खळबळ उडाली. 📍प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुजोरीने वागत असल्याच्या असंख्य तक्रारी.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय,चंद्रपूर येथे बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत मृत्यु झाल्याने खळबळ उडाली.


📍प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुजोरीने वागत असल्याच्या असंख्य तक्रारी.


एस.के.24 तास


चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयात सर्वत्र अव्यवस्था असून डॉक्टरांकडूनही योग्य उपचार होत नसल्याचे समोर आले आहे. 


डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या वरोरा येथील रफीक शब्बीर शेख वय,४९ वर्ष या इसमाचा बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान मृत्युची ही घटना रूग्णालयाने लपवून ठेवली.

वरोरा येथील रहिवासी असलेला रफीक शब्बीर शेख हा इसम १८ जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयात डोळयावर आलेल्या पडद्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला होता. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रफिक शेख याला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले. 

इंजेक्शन देताच त्याला अस्वस्थ वाटायला सुरूवात झाली आणि उलट्या केल्या. याच वेळी त्याला शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आले. मात्र तिथे प्रकृती आणखी बिघडली व अवघ्या २० मिनिटात त्याचा मृत्यु झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेशुद्धीकरणाचा डोज अधिक दिल्यामुळे शेख यांचा मृत्यु झाला असावा अशी दबक्या आवाजात रूग्णालयात चर्चा सुरू आहे. 

दरम्यान मृत्यु झाल्यानंतर येथील डॉक्टरांनी तातडीने त्याचे शवविच्छेदन करून अंतिम संस्कारासाठी मृतदेह कुटूंबियांकडे सोपविला. त्यानंतर पार्थिवावर अंतिम संस्कार करून प्रकरण दडपले.

या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधव चिंचोळे यांना विचारले असता, रूग्णाचा मृत्यु झाल्याचे सांगितले. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्युचे खरे कारण समोर येईल असेही ते म्हणाले. 

या मृत्युबाबची माहिती वरिष्ठ कार्यालयात कळविली आहे अशीही माहिती दिली.दरम्यान जिल्हा रूग्णालयात सर्वत्र अव्यवस्था आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांवर वेळीच उपचार होत नाही, त्याला तासंतास वाट बघत बसावे लागते, येथे डॉक्टर असले तरी रूग्णांशी त्यांचे वर्तन अतिशय असहकार्याचे आहे.

प्रशिक्षणार्थी डॉक्टर तर मुजोरीने वागत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.तसेच सर्वत्र दुर्गधी, घाण, पिण्याचे पाणी नाही, अस्वच्छ शौचालय आहे. तेव्हा पालकमंत्री अशोक उईके, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी रूग्णालयाच्या अव्यवस्थेकडे लक्ष देवून डॉक्टरांना रूग्णांशी सौजन्याने वागण्याचा सल्ला द्यावा अशीही मागणी समोर आली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !