गडचिरोली येथे - जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लाखोंचा अपहार.
★ जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी याची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक विक्रम सहारे यांना ३ जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावले असून त्यामुळे एकच खळबळ उडाली.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्ह्यात दर महिन्याला नवीन घोटाळा समोर येत असून या मालिकेत आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची भर पडली आहे. आदिवासी विविध कार्यकारी संस्था,सेवा सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी आदिवासी उपयोजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या निधीची रक्कम नातेवाईकाच्या खात्यात वळती करुन लाखोंचा अपहार केल्याची बाब समोर आली.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी याची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक विक्रम सहारे यांना ३ जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या संदर्भात भाजप सहकारी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे व शिंदेसेनेचे आरमोरी विधानसभा संघटक नारायण धकाते यांनी पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे तक्रार केली होती.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल मागवला.
यात जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयीन बँकेच्या खात्यातून पहिल्यांदा ६ लाख व नंतर ४ लाख रुपये स्वत:च्या नातेवाईकाच्या खात्यात वळविल्याचे निष्पन्न झाले.
रोख वहीत देखील अनियमितता आढळून आली. या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण नसल्याचा ठपका ठेऊन जिल्हा उपनिबंधक विक्रम सहारे यांना जिल्हाधिकारी पंडा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.तीन दिवसांत याबाबत स्पष्टीकरण सादर करावे, असे बजावले असून खुलासा न केल्यास कारवाई केली जाईल,असा इशारा दिला आहे.
या प्रकरणाशी माझा थेट संबंध नाही. माझी स्वाक्षरी स्कॅन करुन हा निधी वळविला आहे. याबाबत लेखापाल हेमंत जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे. फौजदारी कारवाई प्रस्तावित केली असून सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांना याचा सविस्तर अहवाल दिला आहे. - विक्रम सहारे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली
धान,तांदूळ घोटाळा चर्चेत : -
पूर्व विदर्भ हा प्रामुख्याने धान उत्पादक परिसर म्हणून ओळखल्या जातो. त्यात भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे जिल्हे सर्वात अग्रेसर आहे. दरवर्षी या जिल्ह्यात जवळपास ७० लाख टन तांदळाचे उत्पादन घेण्यात येते.
यातल बहुतांश धान शासनानाकडून दरवर्षी भरडाईकरिता गिरणीधारकांना कंत्राट देण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान सुरू झालेला गैरव्यवहार स्वस्त धान्य दुकानापर्यंत कायम राहतो. शेतकऱ्यांकडून धान्य खरेदीसाठी महामंडळाकडून विविध ठिकाणी केंद्र उभारण्यात आले आहे.
खरेदीची नोंदणी करतानाच अधिक प्रमाणात दाखविण्यात येतात. पुढे ही भरपाई तेलंगणातील निकृष तांदूळ यात भेसळ करून करण्यात येते. दरवर्षी याविषयी ओरड होत असते. परंतु एखाद केंद्रावर कारवाई करून मोठा घोटाळा दाबण्यात येतो. यात खरेदी केंद्राच्या कर्मचारीपासून जिल्हा प्रशासनातील अधिकारी, करारपात्र गिरणीधारक ते यांना अभय देणारे राजकीय पुढारी अशी मोठी साखळी या घोटाळ्यात कार्यरत आहे.