गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील येल्ला व लगाम परिसरात डेंग्यूचा कहर.
📍8 दिवसांत 4 बळी,रुग्णसंख्या 94 वर 13 ऑगस्ट ला आणखी एका रुग्णाचा मृत्यू.
एस.के.24 तास
मुलचेरा : जिल्ह्यातील मुलचेरा तालुका, लगाम परिसरात " डेंग्यू " मुळे आठ दिवसात चार जणांना जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रादुर्भाव झाल्यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला अंधारात ठेवल्याने उपायोजनेअभावी प्रादुर्भाव वाढला, असा आरोप गावाकऱ्यांनी केला असून बेजबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
" डेंग्यू " ने दोन मृत्यू झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन खळबळून जागे झाले. पहिला रुग्ण आढळल्यानंतर लगेच जिल्हा मुख्यालयाला माहिती मिळाली असती तर तत्काळ उपाययोजनेने प्रादुर्भाव आटोक्यात आणता आला असतात्यामुळे कदाचित काही लोकांचे प्राण देखील वाचले असते.
परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी तसे केले नाही. परिणामी " डेंग्यू " ची रुग्ण संख्या वाढून दररोज मृत्यू होत आहे. सध्या या परिसरात 94 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.येल्ला व लगाम या दोन गावांत सर्वाधिक रुग्ण असून काकरगट्टा , लगामचेक,गीताली,शांतिग्राम,टीकेपल्ली , कोलपल्ली येथेही रुग्ण आढळले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्यांची चमू याकडे लक्ष देऊन आहे. मात्र, परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार भूमिकेवर रोष व्यक्त केला आहे.