ब्रम्हपुरीतील धान उत्पादक शेतकरी संकटात आधारभूत खरेदी केंद्रांची मर्यादा वाढवण्याची शिवसेना उ.बा.ठा. पक्षाची मागणी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रम्हपुरी तालुक्यात सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. तालुक्यातील १७ आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धान विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचे उद्दिष्ट (लिमिट) संपल्याने, खरेदी केलेल्या मालाचे बिलिंग रखडले आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री (म. रा.), अन्न नागरी पुरवठा मंत्री, कृषिमंत्री, आणि चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यातील १७ खरेदी केंद्रांवर नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात हजारो शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आणले. केंद्राने मर्यादित उद्दिष्टापर्यंत धान खरेदी केले, परंतु त्यानंतर उद्दिष्ट संपल्यामुळे खरेदी केलेल्या धान्याचे बिलिंग होणे थांबले आहे. ऐन हंगामात शेतीसाठी भांडवल आणि घरखर्चासाठी पैशांची गरज असताना तीन महिने उलटूनही बिले न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी १७ ही केंद्रांचे एकत्रित उद्दिष्ट १ लाख क्विंटलपर्यंत वाढवून द्यावे, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हे निवेदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते, विधानसभा प्रमुख डॉ.रामेश्वर राखडे, तालुकाप्रमुख प्रा. ज्ञानेश्वर बगमारे, तालुका समन्वयक शामराव, भानारकर, उपतालुकाप्रमुख विक्रांत समर्थ, गणेश बागडे आणि विभाग प्रमुख लीलानंद ढोरे, धनिराम नकटूजी मेश्राम, देवेंद्र मोतीराम अमृतकर, अशोक गणपत जगझापे, रेवनाथ बाळकृष्ण मेश्रांम, छोटू धोगडे, रामदास फुलझेले, धानोली चक,यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्फत प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.
प्रशासनाने तातडीने या मागणीची दखल घेऊन वाढीव उद्दिष्ट मंजूर न केल्यास शिवसेना तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेऊन शासनाचे लक्ष मागण्यांकडे वेधून घेईल.

