प्रकाश देवढगले यांच्या शेतातील विहीर खचली लाखोचे नुकसान ; घरांच्या भिंती कोसळल्या.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०९/०७/२५ गेल्या दोन दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजविल्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील शेतकरी प्रकाश दादाजी देवढगले यांच्या शेतातील अंदाजे २२ वर्ष जुनी दगडाने बांधलेली विहीर खचली.
विहीर खचल्यामुळे विहिरीवर असलेला मोटार पंप दगड, मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आणि नुकतेच वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी शेतात घुसल्यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांचे अंदाजे लाखोचे नुकसान झाले आहे.मुसळधार पावसाची संततधार सुरू असल्यामुळे गावातील पंढरी उरकुडे ,नंदलाल ठेंगरे, लालाजी कराणकर यांच्या घराच्या भिंती कोसळल्यामुळे घराचे फार मोठे नुकसान झाले आहे.
अ-हेरनवरगांव येथील कर्तव्यदक्ष तलाठी संजय मटाले यांनी भर पावसात पडलेल्या घरांची मोका पाहणी केली व शासनाकडून आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे घर मालकांना सुतोवाच केले.तसेच गावातील हजारो एकर शेती पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांची या पावसाने कंबरच मोडली आहे.शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.