नागपूर मध्ये ओबीसींंच्या मोर्चात तुफान गर्दी.

नागपूर मध्ये ओबीसींंच्या मोर्चात तुफान गर्दी.


एस.के.24 तास


नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेला मोर्चा आज संविधान चौकात धडकला. मोर्चात मोठ्या प्रमाणावर गर्दी आंदोलनकर्त्यांनी “आरक्षण आमचा हक्क आहे ” अशा घोषणा दिल्या.2 सप्टेंबर चा जीआर रद्द करण्यासाठी आणि ओबीसींसाठी न्याय्य हक्कांची मागणी केली आहे. 

हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत २ सप्टेंबर रोजी शासनाने जारी केलेला जीआर (शासन निर्णय) रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी आज नागपुरात ओबीसी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून संविधान चौका पर्यंत काढण्यात आला.

मोर्चासाठी यशवंत स्टेडियम आणि संविधान चौकात व्यासपीठ उभारण्यात आले आहेत. स्टेजवर “ २ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करा ” आणि “ ओबीसी आरक्षणाचा हक्क - ओबीसी आरक्षण बचाव:” असे फलक झळकावण्यात आले आहेत. आंदोलनकर्त्यांचा ठाम आग्रह आहे की, मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय हा अन्यायकारक असून, तो ओबीसी समाजाच्या हक्कांवर घाला आहे.

या मोर्चाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, समन्वय समितीचे सदस्य उमेश कोराम आणि काँग्रेस नेते रवींद्र दरेकर यांनी मोर्चाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आजचा मोर्चा हा एक ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे.” यावरून आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, “ सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेला जीआर हा ओबीसी समाजाच्या मुळावर घाव आहे.या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे हक्क हिरावले जात आहेत.त्यामुळे तो जीआर तात्काळ रद्द झाला पाहिजे. ”

या आंदोलनाला राजकीय पाठबळ देखील मिळाले असून, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांनी देखील जीआर रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, “ मी स्वतः या मोर्चात सहभागी होणार आहे. हा लढा फक्त आरक्षणाचा नाही, तर न्यायाचा आहे. ” ओबीसी समाजाकडून असा इशारा देण्यात येतोय की जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत,तर यापुढे लढा अधिक उग्र आणि व्यापक स्वरूप घेईल.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !