आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार.
📍महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड.
एस.के.24 तास
गडचिरोली : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी साठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना आज उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन, दिल्ली येथे आयोजित समारंभात श्री. पंडा यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.
दुर्गम गडचिरोलीत प्रशासनाची नवी दिशा. -
गडचिरोली जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार १४,४१२ चौ. किमी. विस्तीर्ण असून, येथील ३८%् टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. या भागात माडिया गोंड आणि कोलाम यांसारख्या विशेषतः दुर्बल आदिवासी जमाती (PVTGs) वास्तव्यास आहेत. ७० टक्के पेक्षा जास्त वनक्षेत्र आणि विरळ लोकवस्तीमुळे येथे सेवा पोहोचवणे मोठे आव्हान होते.
आदी कर्मयोगी' अभियानाचे महत्त्वाचे टप्पे. -
या आव्हानांवर मात करण्यासाठी 'आदी कर्मयोगी अभियान - प्रतिसाद देणारा प्रशासन कार्यक्रम' राबवण्यात आला. या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलली गेली:आदी सेवा केंद्रे आणि ग्राम कृती आराखडा जिल्ह्यामध्ये ५५३ आदी सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली. तसेच, सुमारे ५३ हजार नागरिकांचे प्रभावी एकत्रीकरण केले ५५३ ग्रामसभांचे आयोजन करून प्रत्येक गावाचा ग्राम कृती आराखडा तयार करण्यात आला, ज्यात शिक्षण, आरोग्य, उपजीविका आणि पायाभूत सुविधांच्या गरजांचा समावेश आहे.
समुदाय वन हक्क सक्षमीकरण : -
सामुदायिक वन हक्क कायद्यांतर्गत ग्रामसभांना ५.१२ लाख हेक्टरहून अधिक वनजमीन व्यवस्थापनासाठी सुपूर्द करण्यात आली. तसेच, ४९७ ग्रामसभांची मनरेगा अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली.या योजनांची प्रभावी अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १७ विविध विभागांशी प्रभावी समन्वय आणि एकत्रिकरण केले.
या लोककल्याणकारी व परिणामकारक प्रशासकीय मॉडेलमुळे गडचिरोली जिल्ह्यात पुरस्कृत करण्यात आले.राज्यातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची यासाठी निवड झाली.श्री.पंडा यांनी भारत सरकार कडे या मॉडेलचे यशस्वी सादरीकरण केले होते.