बैल शोधायला गेलेल्या वृद्धाची वाघाकडून शिकार ३० दिवसांनंतर जंगलात आढळला सांगाडा.
📍आरमोरी तालुक्यात खळबळ, कपड्यांवरून पटली ओळख.
एस.के.24 तास
गडचिरोली : जंगलात हरवलेले बैल शोधण्यासाठी गेलेल्या एका ७७ वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्माजी पांडुरंग कस्तुरे (रा. मौशीखांब) असे मृताचे नाव असून, बेपत्ता झाल्याच्या ३० दिवसांनंतर गुरुवारी त्यांचा सांगाडा मौशी चक जंगल परिसरात आढळून आला.
या घटनेमुळे परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. धर्माजी कस्तुरे हे २ फेब्रुवारी रोजी आपल्या शेतातील बैल हरवल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी जंगलात गेले होते. मात्र, अंधार पडल्यानंतरही ते घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी गावकरी आणि आप्तेष्टांकडे विचारपूस केली, सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांचा काहीही पत्ता लागला नाही. अखेर आरमोरी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
११ एप्रिल रोजी मौशी चक परिसरातील जंगलात, गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर काही अवशेष विखुरलेले असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
तेथे एक मानवी सांगाडा, फाटलेले कपडे, बैल बांधण्याची दोरी आणि कमरेचा करदोडा आढळून आला. या वस्तूंच्या आधारे कस्तुरे यांच्या मुलाने आणि नातेवाईकांनी हा सांगाडा धर्माजी कस्तुरे यांचाच असल्याची पुष्टी केली.
ज्या भागात हा सांगाडा सापडला, तिथे वाघ आणि बिबट्यांचा मोठा वावर असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येते. वाघाने कस्तुरे यांच्यावर हल्ला करून त्यांना फरफटत नेले असावे आणि त्यानंतर मृतदेहाचा काही भाग फस्त केला असावा,असा संशय व्यक्त केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने नरभक्षक वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मौशीखांब परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सांगाड्याचे नमुने न्यायवैद्यक चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. - विनोद चव्हाण,पोलीस निरीक्षक,गडचिरोली.

