कोटगल चा एल्गार दारूमुक्त गावासाठी महिलांची वज्रमूठ ; रेशन बंद करण्यासह ३००० रुपयांचे बक्षीस जाहीर..!

कोटगल चा एल्गार दारूमुक्त गावासाठी महिलांची वज्रमूठ ; रेशन बंद करण्यासह ३००० रुपयांचे बक्षीस जाहीर..!


एस.के.24 तास 


गडचिरोली : " दारूमुळे उध्वस्त होणारे संसार वाचवण्यासाठी आणि गावातील शांती टिकवण्यासाठी आता गप्प बसणार नाही," असा आक्रमक पवित्रा कोटगल येथील महिलांनी घेतला आहे.कोटगल ग्रामसभा, तंटामुक्त समिती आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावात " संपूर्ण दारूबंदी " चा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून,नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जाणार आहेत.


दारूमुळे कोलमडलेली कुटुंब व्यवस्था आणि महिलांचा आक्रोश गावसभेमध्ये महिलांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेक पुरुषांचे आपल्या संसाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. दारू पिऊन घरी आल्यावर महिलांना अमानवीय वागणूक देणे,जेवताना विनाकारण मुलांवर आणि पत्नीवर शिवीगाळ करणे


आणि घरात सतत भांडण - तंटा करणे यामुळे मुलांच्या भविष्यावर वाईट परिणाम होत आहेत. दारूमुळे अनेक तरुण आणि मध्यमवयीन लोक गंभीर आजारांना बळी पडत असून, कुटुंबाचा आर्थिक कणा मोडला आहे. या सर्व त्रासाला कंटाळून आता महिलाशक्ती एकवटली आहे.


माहिती देणाऱ्याचे नाव राहणार ' पूर्णपणे गुपित '


गावात लपून-छपून दारू विक्री करणाऱ्यांची किंवा दारू गाळणाऱ्यांची माहिती देण्यास लोक घाबरतात. ही भीती दूर करण्यासाठी ग्रामसभेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.जो कोणी खात्रीशीर माहिती प्रशासनाला देईल,त्याचे नाव अत्यंत गुपित ठेवले जाईल आणि त्याला ३००० रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल. यामुळे गावातील सजग नागरिक आता न घाबरता पुढे येऊ शकतील.


कठोर प्रशासकीय कारवाईचा बडगा दारू विक्री करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीला केवळ आर्थिक दंड करून सोडले जाणार नाही,तर त्या व्यक्तीचे रेशन कार्ड (स्वस्त धान्य दुकान) कायमस्वरूपी बंद करण्यात येईल.


शासकीय कामासाठी लागणारे सर्व दाखले आणि योजनांचे लाभ रोखले जातील.तंटामुक्त समिती आणि पोलीस पाटील यांच्यामार्फत गुन्हे दाखल केले जातील.गावाच्या विकासासाठी एक पाऊल पुढे कोटगल गावाला " आदर्श आणि दारूमुक्त "  बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 


" दारूमुळे होणारा छळ आता खपवून घेतला जाणार नाही,प्रत्येक घर सुखी आणि समाधानी व्हावे हेच आमचे ध्येय आहे," असा ठाम निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे. या निर्णयाचे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कौतुक होत असून,कोटगल पॅटर्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.


या गावसभेच्या मीटिंगमध्ये ग्रामपंचायतचे संपूर्ण पदाधिकारी,तंटामुक्त समिती,सर्च व्यसनमुक्ती टीम. म.पो.अधिकारी,गावातील पुरुष व महिला आणि युवा मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !